राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलली असल्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CBSE बोर्ड परीक्षांच्या संदर्भात १२ वाजता बैठक घेतली. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह CBSE चे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed. Results of Class 10th will be prepared on the basis of an objective criterion to be developed by the Board. Class 12th exams will be held later, the situation will be reviewed on 1st June by the Board: Ministry of Education pic.twitter.com/ljVuUkEChB
— ANI (@ANI) April 14, 2021
परीक्षेसंदर्भातील १ जून रोजी CBSE घेणार आढावा
दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार असून बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय अद्याप लांबणीवर टाकला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर CBSE परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता १ जून रोजी CBSE कडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, तर परीक्षा घेण्यासंदर्भात १ जूनला परिस्थिती पाहून निर्णय देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे.
सद्यस्थिती CBSE बोर्डाची लेखी परीक्षा ही ४ मे पासून होणार होती. मात्र देशात कोरोना बाधितांचा आकडा आणि कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षा न घेण्याची मागणी सोशल मीडियावर सातत्याने होत होती. तर राजकीय, अभिनय क्षेत्रातील मंडळी जसे की, अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी अन्यथा त्याला दुसरा कोणताही पर्याय शोधावा, अशी मागणी देखील लावून धरली होती. याचपार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या बैठकीनंतर CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राज्यातील १० वी, १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी दिली. दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.