देशात विविध ठिकाणी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक अर्थात सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये मुस्लीम अल्पसंख्य नागरिकांचं प्रमाण जास्त आहे. दिल्लीमधल्या शाहीन बागमध्ये तर गेल्या ५० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बाग आणि जामियामध्ये आंदोलकांविरोधात गोळीबार होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. यासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरू असताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही घोषणा केली आहे. ‘राष्ट्रीय स्तरावर एनआरसी प्रक्रिया लागू करण्याचा सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही’, असं गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं आहे. त्यामुळे आता यावर आंदोलकांची काय भूमिका असेल, हे पाहाणं उत्सुकतेचं असणार आहे.
MoS Home Nityanand Rai in a written reply to a question in Lok Sabha: Till now, the government has not taken any decision to prepare National Register of Indian Citizens (NRIC) at the national level. pic.twitter.com/e3OarkJv9x
— ANI (@ANI) February 4, 2020
यासंदर्भात राज्यसभेत चर्चा सुरू असताना काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआर या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. इतर सर्व मुद्द्यांना बाजूला ठेऊन या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली होती. अशाच प्रकारची आक्रमक भूमिका लोकसभेत देखील विरोधकांनी घेतल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, ‘एनआरसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही’, असं देखील राय यावेळी म्हणाले.