शिर्डी – केंद्र सरकारने शिर्डी विमानतळाला देशातील महत्वाच्या विमानतळांमध्ये स्थान दिले आहे. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने राजपत्र जारी करत शिर्डी विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ असल्याची घोषणा केली.
२ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले. शिर्डीत येण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याने अल्पावधीतच या विमानतळाला मोठी पसंती मिळाली. गेल्या तीन वर्षात तब्बल ९ लाखांहून अधिक प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतलाय. त्यामुळे अधिनियमानुसार केंद्र सरकारने राजपत्र जारी करत देशातील महत्वाच्या विमानतळात शिर्डी विमानतळाचा समावेश केला.
शिर्डी विमानतळावर दररोज अनेक विमानांचे आगमन आणि उड्डाण होते. चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद, मुंबईसह अनेक राज्यातून शिर्डीत विमानांची ये-जा सुरू असते. याठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा निर्माण करण्याचे काम प्रगतीपथावर असून, हे काम पूर्ण होताच रात्रीही विमानांच्या उड्डाण-उतरण्याचा मार्ग मोकळा होईल. कोरोना संकटामुळे साई मंदिर बंद असल्याने गेले काही महिने येथील विमानसेवा विस्कळीत झाली होती. मात्र, आता साई मंदिर सुरू होताच शिर्डी विमानसेवेला भाविकांचा पुन्हा एकदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय.