पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांचा विरोध असलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान, उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे लागू करू शकते असे वक्तव्य केले. त्यानंतर लगेचच राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनीही सरकार पुन्हा कृषी कायदे लागू करू शकते असे विधान केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना कलराज यांनी हे विधान केले.
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा सकारात्मक पाऊल असल्याचेही कलराज यांनी म्हटले आहे. मात्र सध्याची परिस्थिती ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी योग्य नाही. यामुळे हे कृषी कायदे सरकार पुन्हा लागू करू शकते. असे कलराज यांनी म्हटले. त्याचबरोबर हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होते. पण त्यांना ते नीट समजावून सांगण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली ती आता निवळेल. पण गरज असेल तेव्हा हे कृषी कायदे पुन्हा लागू करण्यात येतील असेही सूचक विधान कलराज यांनी यावेळी केले. कलराज यांच्या या विधानानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
साक्षी महाराज काय म्हणाले होते.
कलराज यांच्या आधी उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की अनेकवेळा कायदे बनतात , पुन्हा मागेही घेतले जातात आणि परत लागूही केले जातात. साक्षी महाराजांच्या या विधानावरूनही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
.