चंद्रपुर शहरालगत असलेल्या दुर्गापूर येथे तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरक्षा जगजीवन पोप्पलवार असं या मुलीचं नाव आहे. आरक्षा ही दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये संध्याकाळच्या वेळेत अंगणात खेळत होती. त्यावेळी तिच्यावर बिबट्याने हल्ला केला. समोर बिबट्या मुलीला घेऊन जात असलेले पाहताच मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मुलीच्या आईने काठीने बिबट्याचा प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावले.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी अवस्थेतील आरक्षा जगजीवन पोप्पलवार हिला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त ग्रामस्थांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना एका घरात डांबले. हल्लेखोर वाघ-बिबट यांचा बंदोबस्त झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
स्थानिक नागरिकांच्या संतप्त भूमिकेमुळे दुर्गापूर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलीस, वनविभागाचे अधिकारी, महसुली अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुर्गापूर-उर्जानगर भागात वाघ-बिबट्यांचे सातत्याने हल्ले होत असून गेल्या 2 वर्षात वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात किमान 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दुर्गापूर परिसरात या आधी 1 मे रोजी गीता विठ्ठल मेश्राम या 47 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसंच, 30 मार्चला प्रतिक बावणे या 8 वर्षीय मुलाचा आणि 17 फेब्रुवारीला राज भडके या 16 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मात्र यावर वनविभागाने कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळेच नागरिकांनी संतप्त होत वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना डांबले असे नागरिकांचे मत आहे. जवळपास पाच तासांनंतर गावकऱ्यांनी डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.
वनअधिकार्यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे 9 एप्रिलला या भागातून एक बिबट जेरबंद केला होता मात्र त्यानंतरही हा धुमाकूळ सुरूच राहिल्याने संतप्त नागरिकांनी टोकाची भूमिका घेतली.
हेही वाचा – आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!