नवी दिल्ली : कर्नाटकच्या (Karnataka) बागलकोट (Bagalkot) चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) तेथील काॅंग्रेस सरकारने (Congress Government) दोन दिवसांपूर्वी हटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक पोलीस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला आहे. या पुतळ्याला आवश्यक अनुमती नसल्याचे कारण देऊन 6 फुटी पुतळा हटवण्यात आल्याचे नगरपरिषदेने म्हटले आहे. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत असल्यामुळे सरकारकडून कलम 144 लागू करून संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj statue removed tension in Karnatakas Bagalkot What is the reason)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे 2020 रोजी ‘लायन्स क्लब सर्कल’मध्ये स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन भाजपा नेत्यांकडून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. परंतु प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याचा दावा नगरपरिषदेने केला आहे. त्यामुळे अवैधरित्या उभारण्यात आलेला पुतळा हटवल्याचे नगपरिषदेने म्हटले आहे. त्यामुळे भाजपाने कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहेत.
हेही वाचा – आमचा साबण ‘ECO’ फ्रेंडली…, भाजपातील इनकमिंगवर नितीन गडकरी यांची सूचक प्रतिक्रिया
काँग्रेसची मुजोरी आम्ही सहन करणार नाही
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हटले की, शिवरायांचा पुतळा हटवणं हा संपूर्ण देशाचा आणि कोट्यवधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची मुजोरी आम्ही सहन करणार नाही. कारण महापुरूषांचा सातत्यानं अपमाण करणं हे काँग्रेस आता धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारने शिवरायांचा पुतळा सन्मानाने स्थापित करावा नाहीतर काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे अनेक वेळा प्रयत्न
कर्नाटक सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रयत्न अनेक वेळा समोर आले आहेत. अशातच बागलकोट येथे 2020 मध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी अनधिकृत असल्याचे सांगत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हटवला आहे. त्यामुळे शहरता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांकडून या कारवाईला विरोध होत आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारकडून कलम 144 लागू करून शुक्रवारी (18 ऑगस्ट) मध्यरात्री बारापासून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र जमावबंदीचे आदेश असतानाही भाजपाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने एकत्र आंदोलनात सहभाग घेतला.
हेही वाचा – ब्राम्हण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात; भिडेंवर टीका करताना छगन भुजबळ असे का म्हणाले?
शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात
भाजपा आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांकडून काँग्रेसच्या हिंदुद्रोही कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून निषेध करणाऱ्या भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या 24 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक जयप्रकाश हक्ररकी यांनी सांगितले आहे. तसेच शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी बागलकोट, गदग, विजापूर या भागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.