जयपूर – काँग्रेसनेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमध्ये भरुन दोन नंबराचा पैसा भाजप कार्यालयात पोहचवला जातो, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे. जयपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी हे गंभीर आरोप केले.
कांदा बटाट्यांनी राज्यातील सरकारे पडलेली नाहीत –
गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश राज्यातील सरकारे काही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत, अशी टीका अशोक गेहलोत यांनी भाजपवर केली. पुढे त्यांनी नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ज्या 500-1000 च्या नोटा जास्त जागा घेत होत्या, त्या यांनी बंद केल्या, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. यांनी 1000 रुपयांची नोट बंद करुन 2000 रुपयांच्या नोटा का सुरू केल्या. रुपयांची जी वाहतूक करण्यात येते, त्यात 2000च्या नोटा कमी जागा घेतात, त्यामुळे हे करण्यात आल्याची टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
हे काय करतात तुम्हाला माहीत आहे का? ज्या राज्यात भाजपाची सरकारे आहेत, हे तिथे निमलष्करी दल किंवा पोलिसांना पकडतात. त्या निमलष्करी दलांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. हा ट्रक भाजपाच्या कार्यालयाच्या मागे नेला जातो. गाडी पोलीस किंवा निमलष्करी दलाची असेल तर त्या गाडीला पकडणार कोण, लोकांना वाटते त्यांचे पोलीसदल आले आहे, त्यांना मदत करण्यासाठी. हे देशात सुरू असलेलं मोठं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही अशोक गेहलोत यांनी केला आहे.