घरठाणेमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याचं मोदी सरकारकडून चांगभलं

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याचं मोदी सरकारकडून चांगभलं

Subscribe

ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील भाजप सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम ग्राऊंड असलेल्या ठाण्याचं चांगलभलं करण्याचा चंग बांधल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होऊनही दुर्लक्षित असलेल्या ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारी केंद्र सरकारने घेतला आहे. ठाणे खाडी क्षेत्रासह देशातील अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी ट्विटद्वारे दिली.

विशेष म्हणजे ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळादरम्यान केंद्र सरकारकडे पाठविला होता. तो प्रस्ताव अखेर केंद्र सरकारने मान्य केला आहे, परंतु हा प्रस्ताव मान्य करताना केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने अचूक टायमिंगही साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

ठाणे खाडी क्षेत्रात फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे. आता या क्षेत्राला रामसरचा दर्जा मिळाल्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी देश-विदेशातूनही पर्यटक याकडे आकर्षित होणार आहेत. त्यामुळे पर्यावरण आणि पर्यटन वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

नांदूर माध्यमेश्वर, लोणारनंतर ठाणे खाडी क्षेत्र हे रामसर स्थळाचा दर्जा मिळालेले महाराष्ट्रातील तिसरे क्षेत्र आहे. ठाणे खाडी क्षेत्रासह देशात आणखी ११ पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तांपारा तलाव, हिराकुड जलाशय, अनसुपा तलाव, यशवंत सागर, चित्रागुडी पक्षी अभयारण्य, सुचिंद्रम थेरूर पाणथळ क्षेत्र, वाडुवूर पक्षी अभयारण्य, कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य, हायगम पाणथळ संवर्धन क्षेत्र, शालबुग पाणथळ आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. ठाणे खाडी क्षेत्रासह भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या ७५वर गेली आहे.

- Advertisement -

ठाणे ही आशियातील सर्वांत मोठी खाडी असून एकूण ६५२२.५ हेक्टर क्षेत्र यात येते. त्यापैकी १६९०.५ हेक्टर ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित आहे, तर ४८३२ हेक्टर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित आहे. यात भारतातील २० टक्के कांदळवनाच्या प्रजाती आहेत. ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगोसोबत असंख्य स्थलांतरित पक्ष्यांच्या जाती येथे येतात. कांदळवनात आढळणारे विविध मासे, कीटक, फुलपाखरे येथे आढळतात. रामसर दर्जा मिळाल्याने संपूर्ण ठाणे कांदळवन त्यात येईल. परिणामी या संपूर्ण प्रदेशाचे तसेच येथील पर्यावरणाचेही संरक्षण होईल.

रामसर स्थळाच्या दर्जाविषयी
१९७१ साली इराणमधील रामसर शहरात एक परिषद पार पडली. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. यासाठी पाणथळ जागेच्या कक्षेत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा समावेश करण्यात आला. भारताने रामसर करारावर १९८२ साली स्वाक्षरी करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले. सध्या जगातील २४१० पाणथळींना रामसरचा दर्जा प्राप्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -