नवी दिल्लीः डिसेंबर महिन्यात सुरु झालेल्या थंडीने आता चांगलाचा जोर पकडला आहे. कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाच्या सरी असे वातावरण सध्या देशभरात आहे. श्रीनगर खोऱ्यात पारा -४ अंश झाला आहे. तेथे पाण्याचे स्त्राेतही गोठले आहेत. त्यामुळे तेथे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातही तापमान १५ ते २० अंश खाली आले आहे.
अगदी १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रसह मुंबईत उकाडा होता. कडक उन्हामुळे हा नेमका कोणता ऋतू सुरु आहे असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हळूहळू थंडीने जोर पकडण्यास सुरुवात केली. आता तर देशभरात थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. देशातील काही भागात तर धुक्यांमुळे जीवनमान मंदावले आहे. काही ठिकाणी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. पुढील २४ तासात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
तामिळनाडू राज्यातील काही भागासह दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेश, पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. कर्नाटक, केरळ आणि नागालँडमध्ये हलक्या सरी बरसल्या आहेत. ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या भागातही स्कायमेटने पावसाचा अंदाच वर्तवला आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात येत्या २४ तासात दाट धुके पडेल, असा अंदाज आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये किमान तापमान -४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. दरम्यान, खोऱ्यातील इतर भागात तापमान -८ अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा १५ ते २० अंश घसरला आहे. मुंबईत थंडीने जोर पकडला आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्येही तापमानात घट होत आहे. ही थंडी रब्बी पिकासाठी चांगली आहे. थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पर्यटनस्थळांवरही थंडीमुळे धुके पसरले आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी होत आहे.