देशात थंडीचा कडाका मोठ्याप्रमाणात जाणवत आहे. यात जम्मू-काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवतोय. दरम्यान 14 जानेवारीपर्यंत पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी दिला आहे. त्याच वेळी, पुढील 4-5 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके आणि थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही थंडीचा कहर सुरूच आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भाग थंडीची लाट आणि धुक्याच्या विळख्यात राहणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अलवर, भरतपूर, झुंझुनू, सीकर, बिकानेर, चुरू, हनुमानगढ, गंगानगर आणि नागौर आदी जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि धुक्याचा यलो अलर्ट जारी केला आहे.
आयएमडीने जारी केलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीपर्यंत विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि ओडिशामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील दोन दिवसांत उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरू राहू शकतो. 11 आणि 13 जानेवारी रोजी ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 13 जानेवारीला विदर्भात, 11 जानेवारीला छत्तीसगडमध्ये, 11 जानेवारीला झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये, 12 जानेवारीला उप-हिमालयीन पश्चिम बंगाल सिक्कीम आणि तेलंगणा तर 12 जानेवारीला ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. IMD ने 11 ते 13 जानेवारी दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 12 आणि 13 जानेवारीला मध्यम आणि हलका पाऊस पडू शकतो.
तर तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे येथे 4 ते 5 दिवसांत हलका पाऊस पडू शकतो. तसेच, 13 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर 12 जानेवारी रोजी तेलंगणामध्ये वादळ किंवा गारपीट होऊ शकते.
मध्य महाराष्ट्रात थंडी वाढू शकते. येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 12- 15 जानेवारीला आणि उत्तर राजस्थानमध्ये 11-13 जानेवारीला थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पुढील तीन दिवसांत राजस्थानमध्ये धुके किंवा खूप दाट धुके पडू शकते.
मुंबई थंडीची तीव्र लाट
राज्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमान मोठ्याप्रमाणात घटतेय. अशात पुढील काही दिवसांत तापमान आणखी घटणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात सोमवारी नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे 7.3 अंश सेल्सिअस आणि जळगावात 9 अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा जोर वाढलाय.