नवी दिल्ली: काॅंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरतच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर आता लोकसभेने मोठी कारवाई करत, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. त्यानंतर आता काॅग्रेसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. काॅंग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे.
गरज पडली तर तुरुंगात जाऊ- मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपने राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी खूप प्रयत्न केले. जे सत्य बोलत आहेत त्यांना ठेवायचे नाही, असे भाजपचे धोरण आहे. पण आम्ही सत्य बोलत राहू. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू, गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगात जाऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. तसेच, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता पक्ष कार्यालयात आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू, अशी माहिती काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.
( हेही वाचा: राहुल गांधींवरील कारवाई ही ठरवून केलेली…, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल )
लोकशाहीच्या विरोधात भाजप सरकार
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधी यांनी अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले तेव्हापासून राहुल गांधींना गप्प करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू झाला. हे भाजप सरकारच्या लोकशाही विरोधी, हुकूमशाही वृत्तीचेच एक उदाहरण आहे.
भारतीय लोकशाही ओम शांती – जयराम रमेश
आम्ही कायदेशीर आणि राजकीय दोन्ही प्रकारे ही लढाई लढत राहू. आम्ही भाजपला घाबरणार नाही किंवा गप्प बसणार नाही. पीएम मोदी यांच्या संबंधित अदानी महामेगा स्कॅममध्ये जेपीसीऐवजी राहुल गांधी अपात्र ठरले आहेत. भारतीय लोकशाही ओम शांती, असे काॅंग्रेसचे जनरल सेक्रेटरी जयराम रमेश म्हणाले.
( हेही वाचा: बेकायदेशीर संघटनेचे सदस्य असणे हा देखील गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय फिरवला )
काय म्हणाले होते राहुल गांधी?
2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदी आडनावावर टीका करताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे सगळेच चोर असतात, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन त्यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.