लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय बुधवारी केंद्राने जाहीर केला. त्यानंतर काही वेळातच तो निर्णय मागेदेखील घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जे आहेत, तसेच राहतील, असं स्पष्ट केलं. यावरुन विरोधी पक्षांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार?, असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात यांनी निर्मला सीतारमण यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना हा सवाल केला आहे. “गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार? https://t.co/lfViwwkjjM
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 1, 2021
काय होता निर्णय?
केंद्रातील मोदी सरकारने बुधवारी रात्री अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फटका सामान्य गुंतवणुकदारांना बसला असता. केंद्राच्या निर्णयामुळे सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. यानंतर सकाळी निर्मला सीतारमण यांनी सकाळी ट्विट करत हा आदेश मागे घेतल्याचं जाहीर केलं.