जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत भाजपला फटकारलं आहे. भाजपवाले सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलतात. पण आतापर्यंत एकही पुरावा देण्यात आलेला नाही. भाजप खोटं बोलून राज्य करतंय. त्याची माहिती ना संसदेत मांडली गेली ना सार्वजनिक ठिकाणी मांडली गेली, असं दिग्विजय सिंह म्हणाले.
#WATCH | J&K: They (Centre) talk about surgical strikes and that they have killed so many of them but there is no proof: Congress leader Digvijaya Singh pic.twitter.com/3ovyecOpT9
— ANI (@ANI) January 23, 2023
पुलवामामध्ये आमचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की, जवानांना एअरलिफ्ट करावं. पण मोदींनी ते मान्य केलं नाही. इतकी मोठी चूक कशी झाली?, आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. उरी दहशतवादी हल्ल्याच्या सुमारे १० दिवसानंतर २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं. सरकारनं सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा केला, पण पुरावा दाखवलाच नाही, असंही सिंह म्हणाले.
हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम
भाजप सरकार हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवत आहे. ते कोणतंही काम करत नाहीत. सरकारला येथे कोणतेही काम करायचे नाही, येथील प्रश्न सोडवायचा नाही. काश्मीर फाइल्स यांसारखे चित्रपट बनत राहावेत म्हणून भाजपला ही समस्या कायम ठेवायची आहे, असं सिंह म्हणाले.