नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जे काही बोललं गेलं, ते अत्यंत दुःखद आहे. शहा यांनी आंबेडकरांचा उल्लेख करत देवाची व्याख्याच बदलून टाकल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. (congress leader kharge rahul gandhi press conference after case of pushing in parliament)
आंबेडकरांवर अशाप्रकारे टिप्पणी होणे, हे खेदजनक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे काही बोलले आहेत ते तथ्याला सोडून आहे. नेहरू – आंबेडकरांबाबत भाजप जे काही बोलते ते निव्वळ खोटे आहे. भाजपने या महापुरूषांचा अपमान केल्याचेही ते म्हणाले. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आपली चूक मान्य करायला तयार नाहीत. यामुळेच आमची मागणी आहे की, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि देशाची माफी मागायला पाहिजे.
गुरुवारी राज्यसभेत जी धक्काबुक्की झाली, त्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या वृद्ध खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला. या आरोपांनंतर आणि अमित शहा यांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजप तसेच अमित शहा यांच्यावर टीका केली.
‘भारतीय राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावर मंगळवारी झालेल्या चर्चेत विरोधकांवर तोंडसुख घेत शहा म्हणाले, ‘आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… असे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्गात गेले असते.’ शहा यांच्या या विधानावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत खर्गे म्हणाले की, आम्ही संसदेत रोज निदर्शने करत होतो. पण कधीच हिंसा झाली नाही. आजही आम्ही शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करत होतो. याचवेळी आमच्यावर हल्ला झाला. भाजपच्या खासदारांनी मला देखील धक्का दिल्याचे खर्गे यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Rahul Gandhi : संसदेच्या पायऱ्यांवरून धक्का दिल्याचा भाजप खासदार आरोप, राहुल गांधींनी दिलं उत्तर; म्हणाले…
राज्यसभेत झालेल्या धक्काबुक्कीच्या वादानंतर कॉंग्रेसने ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भाषणावर खर्गे यांनी यावेळी टीका केली. केंद्रीय सरकार, विशेषतः पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे डॉ. आंबेडकरांवर जी विधाने करत आहेत, ते अत्यंत दुःखद आहे. अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत देखील वास्तवाशी फारकत घेऊनच विधाने केल्याचे खर्गे म्हणाले.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar