बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना राणौतने देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील देशाच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मणिशंकर यांनी सोमवारी राजधानी दिल्ली येथे एक सभा घेतली होती त्यावेळी भारत देश २०१४पासून अमेरिकेचा गुलाम असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मागील सात वर्ष आपण अमेरिकेचे गुलाम होऊन बसलो असल्याचे त्यांनी म्हटले. मणिशंकर यांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
मणिशंकर अय्यर नेमकं काय म्हणाले?
मागील सात वर्षांच्या काळात देशात अलाइनमेंटवर भाष्यच होत नाही. शांततेवर कोणीही बोलत नाही. आपण अमेरिकेचे गुलाम होऊन बसलो आहोत आणि ते चीनपासून संरक्षण करा असे म्हणत आहेत. पण चीनचा सर्वात जवळील मित्र देश हा अमेरिकाच असल्याचे विसरू नका. पुढे ते म्हणाले, भारत आणि रशियाचे मैत्रीसंबंध अनेक वर्षांपासूनचे आहेत. मात्र मोदी सरकार स्थापन झाल्यापासून ते संबंध कमजोर झालेत. २०१४पर्यंत रशियासोबत जसे संबंध होते तसे संबंध आता राहिले नाहीत.
पुढे अय्यर असे म्हणाले की, रशिया नेहमीच भारतासोबत उभा राहिला. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नानंतर रशियाने भारतासोबत अनेक प्रकारचे संबंध स्थापन केले. इंदिरा हे तर रशियामधील प्रसिद्ध नाव झाले होते. अनेक मुलींची नावे त्यावेळी इंदिरा अशी ठेवण्यात आली होती. स्वातंत्र्याच्या आठ वर्षांनंतर १९५५नंतर भारत आणि रशियामधील प्रगतीत सातत्याने वाढ होत राहिली मात्र गेल्या सात वर्षांपासून भारत अमेरिकेचा गुलाम झाला झाल्याचे त्यांनी म्हटले.
काही दिवसापूर्वी कंगानाने देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. १९४७ साली देशाला मिलालेले स्वातंत्र्य ही भीक असून २०१४ साली देशाला खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे कंगनाने एका मुलखतीत म्हटले. कंगनाच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली होती.
हेही वाचा – Kangna Ranaut: मुंबईतील शीख संघटनेकडून कंगनाविरोधात तक्रार दाखल