काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी आज पटियाला न्यायालयात (Patiala court) शरणागती पत्करली. 34 वर्ष जुन्या प्रकरणात नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात सिद्धूंना आत्मसमर्पणानंतर न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले आहे.
न्यायालयीन कोठडी –
नवज्योत सिंग सिद्धूंनी (Navjot Singh Sidhu) मुख्य न्यायादंडाधिकाऱ्यांसमोर शुक्रवारी आत्मसमर्पण केले. त्यानंतर सिद्धूना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले. शरणागती पत्करल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्याशिवाय इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, असे सिद्धूंचे सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले.
हेही वाचा – नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा सश्रम कारावास
काय आहे प्रकरण –
27 डिसेंबर 1988 साली संध्याकाळी सिद्धू मित्र रुपिंदर सिंग यांच्यासोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. यावेळी कार पार्किंगवरून त्यांचा 65 वर्षीय गुरनाम सिंह यांच्याशी वाद झाल होता. हे प्रकरण नंतर हाणामारीपर्यंत पोहोचले होते. यावेळी गुरनाम सिंग यांचा रूग्णालयात मृत्यू झाला होता. गुरनाम सिंग यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे त्यावेळी समोर आले होते.
या प्रकरणाचा इतिहास –
प्रकरणात सत्र न्यायालयाने सिद्धू यांना 1999 साली निर्दोष सोडले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने 2006 साली सिद्धू यांना तीन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड केला होता. याविरोधात सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल 16 मे 2018 रोजी लागला. त्यात हत्या करण्याचा सिद्धू यांचा हेतू नसल्याचे नमूद करीत सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना आरोपातून मुक्त केले होते, मात्र भादंवि कलम 323 नुसार दोषी ठरवण्यात आले होते. याअंतर्गत सिद्धू यांना केवळ एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. या प्रकरणात दोन वर्षांनंतर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.