काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. इंदूरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपने माझी प्रतिमा डागाळण्यासाठी कोटींचा खर्च केला आहे. परंतु हे माझ्यासाठी खूप फायदेशीर आहे. सत्य लपवता येत नाही. जर तुम्ही मोठ्या शक्तिसोबत लढत असाल तर तुमच्यावर वैयक्तिक हल्ले होतील. तसेच जर तुमच्यावर हल्ला होत असेल तर तुम्ही योग्य काम करत आहात, असं मला वाटतं. लढा काय आहे?, हा लढा समोर उभ्या असलेल्या व्यक्तिशी नाहीये. तर हा लढा त्यांची विचारसरणी खोलवर समजून घेण्याची आहे. त्यामुळे मला आता आरएसएस आणि भाजपची विचारसरणी चांगलीच समजू लागली आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
शिक्षण आणि आरोग्य ही सरकारची जबाबदारी
महाराष्ट्रानंतर ही भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. राहुल गांधींनी आज इंदूरमध्ये 7वी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधला. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, या देशाचा पाया शेतकरी आहे. त्यांना तुम्ही सोडलं. त्यांना कोणीही मदत करत नाही. त्यांना बी-बियाणं, खते, विमा काहीही मिळत नाही.
खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये सर्व खासगीकरणाच्या मार्गावर आहेत. शाळा आणि रुग्णालयं ही सरकारची जबाबदारी आहे, अशी आमची इच्छा आहे. शाळा आणि आरोग्य सेवेकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले.
गेहलोत-पायलट दोन्ही काँग्रेसची संपत्ती
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेते सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, हे दोन्ही नेते आमच्या पक्षाची संपत्ती आहेत. कोण काय बोलतंय यामध्ये मला जायचं नाहीये. परंतु याचा परिणाम भारत जोडो यात्रेवर होत नाहीये. याबाबत मी खात्रीने सांगतो.
हेही वाचा : आफताबला कोर्टात घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला, पोलिसांकडून हवेत गोळीबार