गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोरोना महामारी भारतात दाखल झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यानंतर सरकारला लॉकडाऊन करणं आनिवार्य होतं. यादरम्यान मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले. ही परिस्थिती हळूहळू पुन्हा पूर्ववत होऊ लागली होती, तर गेल्या महिन्यात पुन्हा अनेक राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले. अशा परिस्थितीत बेरोजगारीचा दर उच्चांकावर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी याबाबत मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे मोठ्या संख्येने लोक बेरोजगार झाले आहेत. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या अहवालानुसार कोविड -१९ च्या दुसर्या लाटेदरम्यान एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपल्या नोकर्या गमावल्या आहेत. अहवालानुसार मे महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण १२ टक्के तर एप्रिलमध्ये ते ८ टक्के होते.
केरळमधील वायनाडचे कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी वाढत्या बेरोजगारीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल यांनी या वाढत्या बेरोजगारीला मोदी सरकारला जबाबदार धऱले असून सवालही उपस्थितीत केला आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी यासंदर्भात एक ट्विट केले आणि म्हटले- “अब की बार कोटी बेरोजगार. कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार! ”
कौन ज़िम्मेदार?
सिर्फ़ और सिर्फ़ मोदी सरकार!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 3, 2021
तसेच, राहुल गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले होते की पंतप्रधानांना लाज वाटावी असे दोन मुद्दे आहेत, पहिले जीडीपी सर्वात कमी आणि दुसरे म्हणजे सर्वाधिक बेरोजगारी. या ट्विटसह त्यांनी एक डेटाही शेअर केला होता.
सीएमआयईच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सर्वत्र कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत ९७ टक्के कुटुंबांनी त्यांचे उत्पन्न गमावले आहे. सीएमआयईचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांच्या मते, असंघटित क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहेत परंतु संघटित क्षेत्र किंवा औपचारिक क्षेत्राला पुन्हा रुळावर येण्यास अधिक वेळ लागेल. अशा परिस्थितीत, ज्या लोकांच्या नोकर्या गमावल्या आहेत त्यांना नवीन रोजगार शोधणे कठीण जात आहे. अहवालानुसार मे महिन्यात बेरोजगारीचे प्रमाण १२ टक्के तर एप्रिलमध्ये ते ८ टक्के होते. ३० मे रोजी बेरोजगारीचा दर १७.१८ टक्के होता, तर २ मे रोजी गेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर १०.८ टक्के होता. शहरी बेरोजगारीच्या दरात १५ दिवसांत ३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.