तेलंगणामधील मतदानाला एकच दिवस शिल्लक असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘तेलंगणामधला प्रचार आता संपला आहे. त्यामुळे मोदींना त्यांच्या पार्ट टाईम जॉबसाठी वेळ मिळेल’, अशा शब्दांमध्ये त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. प्रचाराची सांगता झाल्यानंतर ते हैदराबादमध्ये राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर मोदींवर थेट टीका केली. तसेच, मोदींना प्रसारमाध्यमांसमोर येण्याचं आव्हान देखील राहुल गांधींनी केलं आहे.
हेही वाचा – ‘नरेंद्र मोदी नालायक, भिकार माणूस’
पंतप्रधानपदाचा पार्ट टाईम जॉब!
या ट्विटमध्ये राहुल गांधींनी थेट मोदींच्या पंतप्रधानपदाचाच उल्लेख केला आहे. ‘आता तेलंगणामधला प्रचार संपला आहे. किमान आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा पंतप्रधान पदाचा पार्ट टाईम जॉब करण्यासाठी वेळ मिळेल!’ असा टोमणा राहुल गांधींनी मारला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या टिकेला भाजपमधून कधी प्रत्युत्तर मिळते, याची वाट काँग्रेसवासी पाहात आहेत.
‘मोदींनी प्रश्नांना सामोरं जाण्याचा आनंद लुटावा!’
दरम्यान, नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून एकही पत्रकार परिषद न घेतल्याच्या मुद्द्याला देखील त्यांनी हात घातला. ‘तुम्हाला पंतप्रधान होऊन आता १ हजार ६५४ दिवस लोटले आहेत. अजूनही तुम्ही एक देखील पत्रकार परिषद घेतलेली नाही. मी आज हैदराबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यातले फोटो शेअर केलेत. अशी एखादी पत्रकार परिषद तुम्ही देखील घेऊन पाहा. आपल्याला विचारले जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देणं यात एक वेगळी मजा असते!’, असं देखील राहुल गांधी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Dear Mr Modi,
Now that campaigning is over, hope you can spare some time for your part-time job as PM.
Btw its been 1,654 days since u became PM. Still no press conference?
Some pics from our Hyderabad PC today. Try one someday, it’s fun having questions thrown at you! pic.twitter.com/Tc3I1kLGBI
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2018
दरम्यान, तेलंगणामध्ये ७ डिसेंबरला मतदान होणार असून प्रचाराची सांगता झाली आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षाची नेतेमंडळी या मतदारांना अधिकाधिक प्रमाणात मतदान केंद्रांवर पोहोचवण्याचं नियोजन करताना दिसत आहेत.