काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली आहे. तसेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावरही त्यांनी चिंता व्यक्त करताना या पराभवातून धडा घ्या, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले.
यावेळी त्यांनी पाच राज्यांतील निवडणुकांमधील काँग्रेसच्या पराभवावरही भाष्य केले. या पराभवातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे. असे निकाल का आले? हे जाणून घेतलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्याला एकही जागा मिळाली नाही हे आश्चर्यजनक आहे. या धक्कादायक निकालांची दखल घेतलीच पाहिजे. या निकालांची समीक्षा करण्यासाठी छोटी छोटी टीम तयार करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर पुढील दिशा ठरवता येईल, असे त्या म्हणाल्या.
या निकालाने मी निराश आहे, असं जर मी म्हटलं तर एकप्रकारे वस्तुस्थिती झाकून ठेवल्याचाच तो प्रकार होईल. आपला इतका वाईट पराभव का झाला हे समजून घेतलं पाहिजे. या प्रश्नांतून काही न पटणारे उत्तरे येतील. परंतु त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. आपण सत्य परिस्थितीला सामोरे गेलो नाही किंवा तथ्यांना योग्य प्रकारे पाहिले नाही तर आपण कधीच धडा घेणार नाही. आसाममधील पराभवाची माहिती जितेंद्र सिंह, पश्चिम बंगालची माहिती जितिन प्रसाद, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूची माहिती दिनेश गुंडुराव आणि केरळची माहिती तारिक अन्वर देतील, असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले.
काँग्रेस कार्यकारी समितीची सोमवारी बैठक पार पडली. या ऑनलाईन बैठकीला संबोधताना सोनिया गांधी यांनी हे आवाहन केले. आपण २२ जानेवारीला भेटलो होतो, तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जूनमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्याने पक्षाध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. पराभवातून धडा घेण्याची गरज – सोनिया गांधी