नवी दिल्ली : केंद्र सरकार संसदेत काँग्रेसच्या 10 वर्षांच्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका मांडणार आहे. याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु, त्यांच्या या श्वेतपत्रिकेला ती संसदेत मांडण्याआधीच प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाची माहिती देणारा ब्लॅक पेपर प्रसिद्ध केला आहे. ‘दस साल अन्याय काल… 2014-2024′ असे या ब्लॅक पेपरला नाव देण्यात आले आहे. आज (ता. 08 फेब्रुवारी) हा ब्लॅक पेपर खर्गे यांनी प्रसिद्ध केला आहे. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Congress’ response to the Centre’s White Paper from ‘Black Paper’््)
हेही वाचा… Lok Sabha 2024 : भाजपा देशात 700 जागा सहज जिंकू शकतो, ठाकरे गटाची बोचरी टीका
यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही बेरोजगारीचा मुख्य मुद्दा मांडत आहोत, ज्यावर भाजपा कधीच बोलत नाही. केरळ, कर्नाटक, तेलंगणा या बिगर भाजपा राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात भाजपाने 411 आमदारांना आपल्या गोटात आणले आहे. त्यांनी काँग्रेसची अनेक सरकारे पाडली. मोदी सरकारच्या 10 वर्षात युवक, महिला, शेतकरी, अल्पसंख्याक आणि कामगारांवर झालेल्या अन्यायाचा काँग्रेसने या काळ्या पत्रिकेत उल्लेख केला आहे.
देशातील सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे, मात्र मोदी सरकार त्यावर कधीच बोलले नाही. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात मनरेगाचे पैसे सुद्धा सोडत नाहीत आणि नंतर पैसे निघाले पण खर्च झाले नाहीत असे सांगतात. केंद्र सरकार नेहमीच काँग्रेसबाबत, त्या काळातील महागाईबाबत बोलत असते. पण आताच्या महागाईबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. त्यांच्याकडून आधीची आश्वासने पूर्ण झालेली नाहीत, पण आता ते नवीन आश्वासने देऊ लागले आहेत, असा टोलाही मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.
इतकेच नाही तर केंद्र सरकारमुळे लोकशाहीला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत ते म्हणाले की, भाजपा लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आपल्या पक्षातील लोकांना घाबरवत आहे. ते काँग्रेसच्या नेत्यालाही घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही घाबरत नाही. जनहितासाठी आम्ही काळा कागद आणला आहे, असे खर्गे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
काय असेल केंद्राच्या श्वेतपत्रिकेत?
केंद्राकडून लवकरच काँग्रेसच्या 2004 ते 2014 या काळातील कामावर श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. श्वेतपत्रिकेत भारताची आर्थिक दुर्दशा आणि 2004 ते 2014 या काळात देशावर सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेवर झालेले नकारात्मक परिणाम स्पष्ट केले जातील. त्याचबरोबर त्या काळात घेतलेल्या सकारात्मक निर्णयांच्या परिणामाबद्दलही या वेळी चर्चा केली जाईल, अशी माहिती समोर आली आहे.