पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येईल अशी घोषणा केली. लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारकडून काढून घेत केंद्र सरकार लसीकरण करणार असल्याची माहिती मोदींनी दिली. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीकास्त्र डागलं आहे. जनतेच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या तुघलक मोदी सरकारला बौद्धिक लसीची गरज आहे, असा घणाघात सचिन सावंत यांनी केला.
सचिन सावंत यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. “जनतेच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या तुघलक मोदी सरकारला बौद्धिक लसीची गरज आहे. एकाधिकारशाही मध्येच मनमानीपणे निर्णयांची धरसोड केली जाते. आधी लसीकरण केंद्र करत होते नंतर राज्यांना सांगितले आता पुन्हा निर्णय बदलला. यात अनेक प्राणाला मुकले. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊनमध्ये हेच अनुभवले,” असं ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.
जनतेच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्या तुघलक मोदी सरकारला बौद्धिक लसीची गरज आहे.
एकाधिकारशाही मध्येच मनमानीपणे निर्णयांची धरसोड केली जाते.
आधी लसीकरण केंद्र करत होते नंतर राज्यांना सांगितले आता पुन्हा निर्णय बदलला. यात अनेक प्राणाला मुकले. नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन मध्ये हेच अनुभवले— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 7, 2021
केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वतः घेतली होती. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांना दिली होती. दरम्यान, आता केंद्राने हा निर्णय मागे घेत लसीकरणाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे.