नवी दिल्ली- माजी पंतप्रधान राजीव गांधी (Former PM Rajiv Gandhi) यांच्या सहा मारेकऱ्यांना सोडून देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. परंतु, हा निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येकरांना सोडून देण्याचा निर्णय अस्वीकार्य आणि पूर्णपणे चुकीचा आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सुटका; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
काँग्रसचे महासचिव जयराम रमेश यांनी पक्षाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे. देशातील सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या भावनेचा विचार केला नाही. काँग्रेस पक्ष याविरोधात स्पष्ट करतं की हा निर्णय पूर्णपणे अक्षम्य आहे.
My statement on the decision of the Supreme Court to free the remaining killers of former PM Shri. Rajiv Gandhi pic.twitter.com/ErwqnDGZLc
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) November 11, 2022
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह चार आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच त्यांच्या पित्याच्या मारेकऱ्यांना सोडण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. (supreme court orders release of six in rajiv gandhi assassination case)
या सहा जणांच्या सुटकेचे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तामिळनाडू सरकारने यापूर्वी राज्यपालांकडे त्यांच्या सुटकेची शिफारस केली होती. मे महिन्यात, आणखी एक दोषी पेरारिवलनला सर्वोच्च न्यायालयाने आधीच सोडण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले की, एस. नलिनी, जयकुमार, आरपी रविचंद्रन, रॉबर्ट पियास, सुतेंद्रराजा आणि श्रीहरन यांना सोडण्यात आले आहे. तुरुंगातील त्यांचे वर्तन चांगले असल्याचे आढळले असून, या सर्वांनी तुरुंगात असताना विविध पदव्याही प्राप्त केल्या होत्या.
याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की तामिळनाडू मंत्रिमंडळाने 9 सप्टेंबर 2018 रोजी त्यांची सुटका करण्याची शिफारस केली होती. तसेच, राज्यघटनेच्या कलम 142 अन्वये आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने 18 मे रोजी पेरारिवलन यांना सोडण्याचे आदेश दिले होते. ज्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला होता.
21 मे 1991च्या रात्री हत्या
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 च्या रात्री तामिळनाडूच्या श्रीपेरुम्बुदूर येथे एका महिला आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली होती. त्याची ओळख धनू म्हणून निवडणूक रॅलीत पटली होती.
सोनिया गांधींनी अगोदरच माफ केले होते
याआगोदर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांचे पती राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केले होते. याशिवाय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही वडील राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केले आहे.