मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी झाली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने काँग्रेसची 11 बँक खाती गोठवली असून गुरुवारी सुमारे 1800 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत जनमताच्या मैदानात समोर येऊन लढण्याचा आव्हान भाजपाला दिले आहे.
हेही वाचा – Electoral Bond : मतदानापर्यंत ही गोष्ट कुणीही विसरू नये, अन्यथा…, रोहित पवारांनी मतदारांना केले अलर्ट
गल्लीबोळात क्रिकेट खेळताना एखादा चिडका आणि रडका मुलगा आपण सामना हरत असल्याचे कळताच दुसऱ्याची बॅट, स्टंप, चेंडू घेऊन जसा पळ काढतो, अगदी तशी गत भाजपाची झाली आहे, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली आहे. काँग्रेसच्या न्याय यात्रेत खंड पाडण्यासाठी भाजपाने स्वतःकडची होती-नव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली, पण काँग्रेसने केवळ जनतेपर्यंत न्यायाचा संदेश पोहोचवलाच नाही, तर जनताही या लढाईत काँग्रेसच्या हातात हात देत आता सोबत उभी राहिली आहे. ही गोष्ट भाजपाला चांगलीच ठाऊक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गल्लीबोळात क्रिकेट खेळताना एखादा चिडक्या व रडका मुलगा आपण सामना हरत असल्याचे कळताच दुसऱ्याची बॅट, स्टंप, चेंडू घेऊन जसा पळ काढतो.. अगदी तशी गत भाजपची झाली आहे. चिडक्या मुलाप्रमाणे भाजप वागत आहे.
👉 भाजपने स्वतःकडची होती-नव्हती ती सगळी शक्ती पणाला लावली, जेणेकरून काँग्रेसच्या… pic.twitter.com/fHNbk9rezB
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 30, 2024
इलेक्टोरल बॉण्ड हा महावसूली घोटाळा उघड झाल्यानंतर भाजपावाले आणखीन घाबरले आहेत. भाजप आता बावरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळेच मोदी सेना प्रत्येकवेळी एजन्सींना पुढे करत विरोधकांची गळचेपी करण्याचे कुटील डाव सतत खेळत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Thackeray group : मोदी प्रेरणेने सुरू झालेला खेळ, वकिलांच्या पत्रावरून ठाकरे गटाची टीका
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताना प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला चुकीच्या पद्धतीने दंड ठोठावून लक्ष्य केले जात आहे. मागील 10 वर्षे भाजपाची सत्ता असूनही ऐन निवडणुकीच्या तोंडावर 30 वर्षे जुन्या प्रकरणांवर प्राप्तिकर विभागाकडून ही कारवाई का केली जात आहे? चुकीच्या पद्धतीने खाती गोठवण्यात आली. न्यायाच्या लढ्यासाठी सर्वसामान्यांनी जमा केलेले 135 कोटी रुपये काँग्रेसच्या बँक खात्यातून काढण्यात आले आणि आता 1800 कोटी रुपयांची नोटीसही जारी करण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दुसऱ्या बाजूला भाजपाने नियमांची पायमल्ली करत 42 कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या 1297 देणगीदारांचे नाव किंवा पत्त्याचे विवरणपत्र देखील सादर केले नाही. मात्र प्राप्तिकर विभाग या विषयावर मौन बाळगून आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. एकूणच, भाजपाला पराभवाची भीती वाटत आहे, हे स्पष्ट आहे. मुक्त आणि निष्पक्षपणे निवडणुका व्हाव्यात, अशी त्यांची अजिबात इच्छा नाही. भाजपा नेत्यांनी इतके घाबरू नये, पाठीत वार करणे सोडावे, असे सांगतानाच, जनमताच्या मैदानात समोर येऊन लढण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.
हेही वाचा – Sunita Kejriwal : सुनीता केजरीवालांकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा? ठोस भूमिका घेत भाजपावर करतायत टीका