देशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होऊ लागली आहे. जसजशी रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तसतसा मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर Ambulance आणि स्मशानभूमी या सुविधांवरचा ताण देखील वाढू लागला आहे. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार तेलंगणाच्या निजामाबादमध्ये समोर आला आहे. एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह चक्क रिक्षातून स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणल्याचा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक जणांनी रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशील कारभारावर सडकून टीका केली आहे. त्यानंतर रुग्णालयाकडून यावर स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे.
नक्की झालं काय?
निजामाबादच्या सरकारी रुग्णालयात एक ५० वर्षीय व्यक्ती काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झाली. मात्र, शुक्रवारी या व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. नियमित प्रक्रियेनुसार रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सविस्तर तपासणी अहवाल करून त्याला Ambulance मधून स्मशानभूमीपर्यंत नेण्यात येतं. पण या रुग्णाच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह चक्क रिक्षात घालून स्मशानभूमीत नेला. या प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Telangana: Body of a #COVID19 patient taken to a burial ground in an auto-rickshaw from Nizamabad Government Hospital. Dr N Rao, Hospital Superintendent says, "Deceased person's relative who works at the hospital asked us for the body. He didn't wait for an ambulance." (10.07.20) pic.twitter.com/IKhHh3zkbb
— ANI (@ANI) July 12, 2020
काय म्हणणंय रुग्णालयाचं?
या घटनेवर रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रुग्णाचा नातेवाईक रुग्णालयातच कामाला आहे. त्यामुळे त्यानेच रुग्णालयाला मृतदेह ताब्यात देण्याची विनंती केली. यानंतर रुग्णलयाची परवानगी घेऊन शवागारातल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या व्यक्तीने मृतदेह रिक्षामध्ये टाकला आणि घेऊन गेला. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या या स्पष्टीकरणावर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने ठरवून दिल्यानुसार प्रक्रिया का पाळली गेली नाही? तसेच, नातेवाईकाने विनंती केली म्हणून कोरोनाबाधिताचा मृतदेह तपासणी अहवालाविनाच थेट रिक्षातून पाठवू देण्याची जोखीम का घेतली गेली? असे सवाल विचारले जात आहेत.