नवी दिल्लीः चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार केल्याने भारतानेही सुरक्षेच्या उपाय योजना सुरु केल्या आहेत. परदेशातून विमानाने येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीत ५३ जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे.
गेल्या महिन्यात चीनमधील कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढली. त्यामुळे चीनमध्ये लॉकडाऊनही करण्यात आला. लॉकडाऊनविरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली होती. मात्र चीन सरकारने लॉकडाऊनचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर चीनसह दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका येथील संसर्गाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे भारतात केंद्र सरकारने खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी सुरु केली. परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तशा मार्गदर्शक सुचना जारी केल्या. २४ डिसेंबर २०२२ पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर चाचणी सुरु झाली. त्यात ५३ प्रवासी पाॅझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परदेशातील प्रवासी बाधित असल्याचे आढळल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सबव्हेरियंट BF.7 आढळला आहे. त्यामुळे चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना १ जानेवारी २०२३ पासून कोरोना चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या प्रवाशांनी प्रवास सुरु करण्यापूर्वी ७२ तास आधी चाचणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरही प्रवाशांची चाचणी करण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी कोरोना बाधितांची आकडेवारी जाहीर केली. चोवीस तासांत कोरोनाचे २२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. उपचार घेत असलेले रुग्ण ३६५३ आहेत. भारतात कोरोनाची पाचवी लाट येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. मास्कची सक्ती नाही, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.