भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. मागील काही दिवस देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज तीन लाखांच्या घरात होती. शनिवारी हा आकडा आणखीच वाढलेला दिसला. देशात शनिवारी विक्रमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आणि ३५२३ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही रुग्णसंख्या येत्या काही दिवसांत आणखीच वाढण्याचा धोका असल्याचे केंद्रीय पथकाचे म्हणणे आहे. पुढच्या आठवड्यात देशभरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होऊ शकेल, असा इशारा कोरोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी केंद्र सरकारला दिला आहे.
पुढील आठवड्यात ५ ते १० तारखेच्या दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी आणि विक्रमी वाढ होण्याचा आमचा अंदाज आहे, असे केंद्र सरकारला कोरोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या संशोधकांच्या पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी सांगितले. याआधी या पथकाने २ एप्रिलला सिनियर सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ ते १० मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढले असे सांगितले होते. आता या पथकाने पुन्हा सरकारला इशारा दिला आहे.
कोरोनाची दुसरी लाट जुलै किंवा ऑगस्टपर्यंत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने इतक्या लांबचा विचार करण्यापेक्षा पुढील ४ ते ६ आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणे आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका असा आम्ही सरकारला सल्ला दिल्याचे विद्यासागर म्हणाले.
भारतात कोरोनाची पहिली लाट मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आली होती. त्यावेळी ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. आता दुसऱ्या लाटेत हा आकडा तिप्पट झाला आहे. परंतु, हा आकडा आणखी मोठा असू शकेल. याचे कारण म्हणजे अनेकांना कोरोनाची लक्षणे नसल्याने ते चाचणी करत नसल्याचे विद्यासागर यांनी सांगितले.