पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक २०२१ अंतिम टप्प्यात आली आहे. देशात कोरोना प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. देशात पाच राज्यांत निवडणूका घेण्यात येत आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर ५ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत युनव्हर्सल लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. देशात कोरोना लसीकरण जानेवारीपासून सुरु करण्यात आले आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लसीकरण केले आहे. परंतु पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांनी सर्व नागरिकांना मोफत लस देणार असल्याची घोषणा केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या पुर्वीच राज्यातील जनतेला मोफत कोरोना लसीकरण करण्याबाबत आश्वासन दिले होते. राज्यातील गरजू नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाईल अशी घोषणा केली होती. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच या बाबत घोषणा केली जाईल असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. यानंतर आज ममतांनी राज्यातील जनतेला दिलेला शब्द पाळत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा केली आहे.
“FREE UNIVERSAL VACCINATION for everyone above the age of 18 post May 5th”, promises @MamataOfficial pic.twitter.com/aOSRppjeic
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 22, 2021
देशात आतापर्यंत केंद्र सरकारने १३ कोटी कोरोना लसीकरण केले आहे. जगाच्या तुलनेत सर्वाधिक वेगात भारतात लसीकरण मोहिम सुरु असल्याचे म्हटले आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत एकूण १३ कोटी नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. आतापर्यंत ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जात आहे. परंतु १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.
मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पश्चिम बंगालमधील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नियोजित असलेला दौरा रद्द करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये विजयासाठी चुरस लागली आहे. भाजपने या निवडणूकीत विजयी होण्यासाठी सर्वस्व ताकद पणाला लावली आहे. परंतु देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे सर्वोच्च न्यायालयने मोदी सरकारला फटकारले आहे. देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. यामुळे पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदी उद्या देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याची बैठक घेणार आहेत.