राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी आणि डी.राजा हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपतींना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अकाली दलाचे नेते प्रेमसिंग आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. वर्षा बंगल्यावर भेट घेणार आहेत. अकाली दलाची विरोधी नेत्यांसह मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु झाल्याचे यावरुन बोलले जात आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर पत्र लिहिलं आहे.
प्रिय बाबासाहेब,
“देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत.म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.
चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!,” असे जयंत पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.#DrBRAmbedkar #6december#महापरिनिर्वाण_दिवस pic.twitter.com/PtIE2AjPzZ
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 6, 2020
‘आरण्यक’मधील धृतराष्ट्र, पुलंच्या अजरामर ‘तुजं आहे तुजपाशी’मधील दिलखुलास काकासाहेब यांसारख्या अनेक संस्मरणीय भूमिका साकारणारे, वयाच्या ८२व्या वर्षीही रंगभूमीवर तितक्याच ताकदीने उभे राहणारे, अस्सल ठाणेकर रवी पटवर्धन यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
– एकनाथ शिंदे, नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि पालकमंत्री, ठाणे व गडचिरोली
लालबाग परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून स्फोटात २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
१४ एप्रिल २०२३ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण करणार, असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.