कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सावरलेल्या देशातल्या अनेक शहरांमध्ये आता डेंग्यू, चिकुनगुन्या आणि तापासारख्या आजारांचं संकट उभं राहिलंय. एकट्या दिल्लीत आजवर डेंग्यूची किमान १२४ प्रकरणं समोर आली आहेत. देशभरात केवळ डेंग्यूने १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच संसर्गजन्य आजारांच्या आव्हानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सर्वाधिक प्रभाव उत्तर प्रदेशात दिसून आला असून, या ठिकाणी डेंग्यूमुळे सुमारे ७५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. याशिवाय दिल्ली, मध्य प्रदेश व अन्य राज्यांमध्ये संसर्गजन्य आजारांमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे कोरोनासाठी सज्ज आरोग्य व्यवस्थेवर अधिक ताण आलाय.
डेंग्यूचे डास केवळ स्वच्छ आणि स्थिर पाण्यात निर्माण होतात, तर मलेरियाचे डास घराब पाण्यात तयार होतात. अशा परिस्थितीमुळे आरोग्य क्षेत्रात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांपुढे संकट उभं ठाकलंय. उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यात दररोज तब्बल ३ हजारांहून अधिक व्यक्तींना तापाची लक्षणे दिसताहेत.
भोपाळमध्ये १०७ रुग्ण, इंदूरमध्ये एकाचा मृत्यू
मध्य प्रदेशातल्या भोपाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासांत डेंग्यूचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. मंगळवारी शहरात नवे ८ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ९५ वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या महिन्यात एका गर्भवती महिलेचा डेंग्यूने बळी घेतला होता. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.