नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Covid-19) संक्रमण वाढत असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने (Union Government) महाराष्ट्रासह (Maharashtra) आठ राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्राने या राज्यांना संसर्ग दर आणि प्रति 100 चाचण्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. महामारी (Pandemic) अद्याप संपलेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक स्तरावर सतर्क राहण्याची गरज आहे. आता आपल्याकडून एखादी जरी चूक झाली तर, त्याचा फटका सहन करावा लागेल, असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे.
“Strengthen COVID-19 surveillance”: Union Health Secy writes to eight states amid ‘consistent rise’ in cases
Read @ANI Story | https://t.co/FSxPW7j5as#Covid #Coronavirus #covid19 pic.twitter.com/utcBcTNcbS
— ANI Digital (@ani_digital) April 21, 2023
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आठ राज्यांना लिहिलेल्या पत्रात या गोष्टींचा उल्लेख केला आहे. कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणारे बाधित आणि रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असले तरी, राज्य आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता स्थानिक पातळीवर संसर्गाचा प्रसार झाल्याचे निदर्शनास येते, असे राजेश भूषम यांनी या पत्रात म्हटले आहे. ही राज्ये आणि जिल्ह्यांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असून सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णवाढीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – आत्ताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करायला तयार; अजित पवारांचे सूचक विधान
या राज्यांमध्ये वाढत आहे रुग्णसंख्या
केंद्र सरकारने ज्या राज्यांना कोरोनाबाबत सतर्क राहण्यास आणि वाढत्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, केरळ, कर्नाटक, हरियाणा आणि दिल्ली यांचा समावेश आहे. जिथे कोरोनाचे जास्त बाधित आढळत आहेत, अशा या राज्यांमधील जिल्ह्यांची संख्याही केंद्राने सांगितली आहे. या आकडेवारीनुसार, अशा जिल्ह्यांची संख्या केरळमध्ये 14, हरियाणामध्ये 12, दिल्ली व तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 11, महाराष्ट्रात 8, राजस्थानमध्ये 6 आणि यूपीमध्ये एक आहे.
11 हजारांहून अधिक रुग्णांचे निदान
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात 24 तासांत 11 हजार 692 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 170 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 28 जण दगावले असून एकूण मृतांची संख्या 5 लाख 31 हजार 258 वर पोहोचली आहे.