नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेत त्रुटी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत काँग्रेसने राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. मात्र, सीआरपीएफने याला दिलेल्या उत्तरामुळे या यात्रेची दुसरीच बाजू समोर आली आहे. राहुल गांधी यांच्याकडून मार्गदर्शक तत्त्वांचे अनेक प्रसंगी उल्लंघन झाल्याने ही चूक झाल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. 24 डिसेंबर रोजी दिल्लीतील भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा पाहायला मिळाला. गर्दी हाताळण्यात तसेच राहुल गांधींना सुरक्षा पुरविण्यात दिल्ली पोलीस पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि भारत यात्रींनाच राहुल गांधी यांच्याभोवती सुरक्षेचे कडे करावे लागले, असा आरोप काँग्रेसने या पत्रात केला आहे.
Violations of laid down guidelines on the part of Rahul Gandhi have been observed on several occasions & this fact has been communicated to him from time to time. CRPF
— ANI (@ANI) December 29, 2022
काँग्रेसच्या या पत्राला सीआरपीएफने उत्तर दिले आहे. सन 2020पासून आतापर्यंत राहुल गांधी यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे 113 वेळा उल्लंघन केल्याचे आढळले आहे आणि त्यांना वेळोवेळी याची माहिती देण्यात आली आहे. तसेच भारत जोडो यात्रेच्या दिल्ली टप्प्यात राहुल गांधी यांच्या सोबत चालणाऱ्या लोकांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असून सीआरपीएफ हे प्रकरण स्वतंत्रपणे हाताळणार असल्याचे सीआरपीएफने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या सुरक्षा-व्यवस्था असलेल्या व्यक्तीचा दौरा असतो, तेव्हा त्याच्या सुरक्षेची तयारी राज्य पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने सीआरपीएफ करते. सीआरपीएफने 24 डिसेंबरलाच भारत जोडो यात्रेच्या दिल्लीतील टप्प्याची तयारी केली होती. सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले तसेच दिल्ली पोलिसांनी आवश्यक बळ पुरवले होते.