देशात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी अनेक भागात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. दरम्यान देशाची राजधानी दिल्लीतील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आणि केजरीवाल सरकारला चांगलेच फटकारले आहे. यावेळेसे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर स्तुतीसुमनं उधळली असून मुंबईचा अॅक्शन प्लॅन कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खड्डबोल सुनावतं मुंबई महापालिकेचे कौतुक केले. तसेच दिल्लीने मुंबई महापालिकेकडून शिका, असा सल्ला दिल्ली प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दिल्लीमध्ये जे अधिकारी नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे एमएमआरडीच्या सहाय्याने जम्बो कोविड सेंटर असो, लॉकडाऊनमधला मायक्रो प्लॅनिंग असो किंवा अत्यावश्यक गोष्टी विशेषतः ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याकडे अधिक लक्ष केंद्रीत असो, अशा मुंबई महापालिकेच्या कामाचा उल्लेख यावेळी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान मुंबई महापालिकेकडून टेस्ट वाढवण्यावर आणि पॉझिटिव्ह रेट कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबईचा मृत्यूदरही कमी झालेला आहे. मुंबई महापालिकेचे बेड्स मॅनेजमेंट मॉडेल सिस्टिम सगळ्यांनी फॉलो करावे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.
दिल्लीत गेल्या २४ तासांत २० हजार ९६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार २०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दिल्लीत आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ लाख ५३ हजार ९०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १८ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला असून ११ लाख ४३ हजार ९८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९१ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील एकूण कोरोबाधितांची संख्या ६ लाख ६१ हजार १७५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ४३२ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८९ हजार ५७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ५६ हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – Corona Update: चिंताजनक! देशातील कोरोना बळींची संख्या वाढली; ‘या’ राज्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक