नवी दिल्लीः मंदिर, गुरुद्वारे, गावे, शेतीचे जाती जातीत तुकडे करणे. एका मतासाठी तुम्ही देशाचे तुकडे करणे ही कॉंग्रेसची रणनिती आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर केली.
सुधांशु त्रिवेदी म्हणाले, राजकीय हेतूने प्रेरित भारत जोडो यात्रा केरळ येथेही गेली होती. कॉंग्रेसचे दिग्गज नेते या यात्रेत सहभागी झाले. केरळ येथे कॉंग्रेस नेत्यांनी रस्त्यावर बीफ पार्टी केली. या यात्रेत फादर जॉर्ज पुनिया सहभागी झाले होते. फादर जॉर्ज पुनिया भारत भूमीला अपवित्र मानतात.
भारत जोडो यात्रा पुढे तामिळनाडू येथे गेली. तेथे त्यांनी एसपी उदय कुमार यांची भेट घेतली. एसपी कुमार यांनी तामिळनाडू विरोधी भाष्य केले आहे. त्यानंतर राहुल गांधी हे अभिनेता कमल हसन यांना भेटले. देशाकडे दिशाहीन व्हिजन आहे, असा दावा तेथे राहुल गांधी यांनी केला होता, याची आठवण सुधांशु त्रिवेदी यांनी करुन दिली.
नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेल्या कन्हैया कुमार यांचीही राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. भारत जोडो यात्रा काश्मिर येथे गेली तेव्हा या यात्रेचे संयोजक दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे द्वेष पसरवणाऱ्यांना सोबत घेऊन प्रेमाचा कोणता संदेश राहुल गांधी देत आहेत, असा प्रश्न सुधांशु यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये काश्मिरला भारताचा अविभाज्य भाग केला. त्यामुळेच राहुल गांधी हे काश्मिरमध्ये भारताचा झेंडा फडकवू शकले, असा टोलाही सुधांशु यांनी हाणला.
भारत जोडो’ यात्रेला 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. सोमवारी या यात्रेला 145 दिवस पूर्ण झाले. राहुल गांधी यांची ही यात्रा 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून सुमारे 3570 किलोमीटर चालली. रविवारी श्रीनगरच्या लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावल्यानंतर यात्रा समाप्त झाली. सोमवारी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावला. श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर या यात्रेचा औपचारिकरित्या समारोप झाला. तिथे राहुल गांधी यांची सभा झाली.