कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. विमान वाहतूक, रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरही निर्बंध लागू केले होते. मात्र कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे आता निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. २ तासांचा प्रवास असणाऱ्या विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना जेवण देण्याची आणि वाचनासाठी पुस्तके, वृत्तपत्रे उपलब्ध करुन देण्याची परवानगी दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्राकडून विमान प्रवासावर कडक निर्बंध लादण्यात आले होते. यामध्ये २ तासांपेक्षा कमी वेळाच्या प्रवासादरम्यान जेवण देण्यासाठी आणि वाचनासाठी वृत्तपत्र, पुस्तके देण्याची परवानगी नव्हती. मात्र आता नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत २ तासांच्या प्रवासादरम्यान जेवण देण्याची परवानगी दिली आहे. तसेच विमानात वृत्तपत्र, मॅग्जिन वाचण्यासाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामध्ये जेवण देण्यावर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नव्हते.
कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असल्यामुळे केंद्र सरकारने एक आदेश जारी करत दुसऱ्या लाटेमध्ये जे निर्बंध लागू केले होते ते शिथिल केले असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये विमानातील कर्मचाऱ्यांना (केबिन क्रू) पीपीई कीट घालण्यापासून दिलासा दिला आहे. दुसऱ्या लाटेनंतर आता देशांतर्गत विमानसेवा १०० टक्के करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
देशांतर्गत प्रवास करण्यासाठी प्रवाशाने १५ दिवसामध्ये तिकीट खरेदी केले असल्यास त्याच्याकडून योग्य ते प्रवासाचे दर म्हणजे परवानगी दिलेल्या दराप्रमाणे तिकीट आकारण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर २०२० पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला बायोबबलची परवानगी देण्यात आली आहे. मर्यादित आसनक्षमता असल्यामुळे तिकीटाचे दर वाढले आहेत. प्रवाशांना जास्तीचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे उड्डाण कंपन्यांकडून एकतर विमान उड्डाणांची संख्या वाढवण्याची किंवा इतर देशांमधील बंद केलेली सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा : शरद पवार इन ॲक्शन मोड, आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी पवारांचा ४ दिवस विदर्भ दौरा