कोची : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. केरळमध्ये बुधवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. नंतर ते महात्मा गांधी यांच्या फोटोंनी झाकण्यात आले. या यात्रेदरम्यान ठिकठिकाणी स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो लावण्यात आले होते. तथापि, त्यापैकीकेवळ वीर सावरकर यांचे पोस्टर हटविण्यात आले.
#WATCH | Kerala: Picture of VD Savarkar being covered by a picture of Mahatma Gandhi on the campaign poster of 'Bharat Jodo Yatra' that was put up in Kochi earlier today pic.twitter.com/krjnX1r0Uy
— ANI (@ANI) September 21, 2022
काँग्रेसने कायमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विरोध केला आहे. खासदार राहुल गांधी यांनी देखील अनेकदा त्यांच्याविरोधात वक्तव्य केली आहेत. तर दुसरीकडे, भाजपा वीर सावरकर यांना महान स्वातंत्र्यसैनिक मानते. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बऱ्याचदा काँग्रेसवर टीका केली आहे.
आता याच मुद्द्यावरून काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरला तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ झाला. एकूण 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास करत जम्मू-काश्मीरमध्ये तिचा समारोप होईल. पण अवघ्या 14 दिवसांत त्यांची ही यात्रा विविध कारणास्तव वादग्रस्त ठरली आहे. वादग्रस्त विधान करणाऱ्या ख्रिश्चन धर्मगुरूंची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाबाबत केलेल्या ट्वीटवरून वाद झाला होता. ‘भारत जोडो यात्रे’च्या निमित्ताने काँग्रेसने कायम भाजपाला लक्ष्य केले आहे.
कर्नाटकात निर्माण झाला होता तणाव
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात असताना कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील काही भागांत तणाव निर्माण झाल्याने तिथे कर्फ्यू लावण्यात आला होता. अमीर अहमद सर्कल येथे वीर सावरकर यांचे पोस्टर लावण्यात आले होते. मात्र टिपू सुल्तान समर्थकांनी टिपू सुल्तानचा बॅनर लावण्यासाठी वीर सावरकर यांचा बॅनर हटविण्याचा प्रयत्न झाला. त्यावरून दोन्ही गटात वाद होऊन हाणामारीला सुरुवात झाली. तिथे तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. त्यानंतर काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला.
तसेच, मंगळुरू पालिकेने देखील सुरतकल चौकाला वीर सावकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा प्रस्ताव देखील पालिकेत मंजूर झाला होता. त्यामुळे तिथे वीर सावरकर यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला होता, पण तोही नंतर हटविण्यात आला.