मतदान सुरू झाल्यानंतर आधी पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी तसंच फेरफार आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी व्हावी ही विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीदरम्यान काही लोकांनी विरोध प्रदर्शन केलं. निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरू असतानाच बाहेर विरोध प्रदर्शन केले गेले. काही लोकांनी दिल्लीत पोस्टर आणि बॅनर फडकावून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणबाजी केली. मंगळवारी प्रमुख २२ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसंबंधी काही मागण्या केल्या होत्या. विरोधी पक्षांच्या त्याच मागण्यांवर निवडणूक आयोगानं आज बैठक घेतली होती.
Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT. More details awaited pic.twitter.com/zyxETDjWOE
— ANI (@ANI) May 22, 2019
२२ विरोधी पक्ष एकत्र
मतपत्रिका आणायची नसल्यास निवडणूक निकालांवेळी व्हीव्हीपॅटच्या मतांची आणि ईव्हीएममधील किमान ५० टक्के मतांची पडताळणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ गेले होते. या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना सांगितले की, देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यावर निवडणूक आयोगाने संमती दर्शवत या मुद्द्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. अखेर विरोधकांची ही मागणी निवडणूक आयोगानं फेटाळून लावली आहे.