महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत न करणाऱ्या लोकांना गोळ्या घाला, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे राज ठाकरे यांच्याविरोधात खटला भरण्याची तयारी सुरु केलेली आहे. माजी आमदार हाजी जमीरउल्लाह यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून कोर्टाचे कामकाज सुरु होताच आम्ही त्यांच्यावर खटला भरण्याची तयारी करणार असल्याचे सांगितले आहे.
तबलीगी मरकजहून परतलेले सर्वच लोक कोरोनाबाधित नाहीत. काही लोकांना संसर्ग झालेला आहे, त्याचे खापर पुर्ण समाजावर फोडणे योग्य नसल्याचे हाजी जमीरउल्लाह यांनी म्हणाले. अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होत आहे. राज ठाकरेंनी सरसकट अल्पसंख्यांकांच्या विरोधात वक्तव्य केले असल्याचा आरोपही जमीरउल्लाह यांनी केला आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे
काही लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटतो. दिल्लीला जो प्रकार घडला त्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहीजे. या लोकांना वैद्यकिय सेवा द्यायला नको. या सर्वांना एका खोलीत बंद करा आणि त्यांच्यावर उपचार करु नका. यासह मरकज प्रकरणातील काहीजण रुग्णालयात डॉक्टर, नर्ससोबत गैरवर्तन करत आहेत, या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडिओ आता व्हायरल झाले पाहिजे. लॉकडाऊन थोड्या दिवसांसाठी आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
खटला भरण्यासंबंधी त्यांनी वकीलांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनमुळे सध्या कोर्टाचे कामकाज बंद आहे. कोर्ट सुरु होताच १५६/३ अंतर्गत आपण ठाकरेंच्या विरोधात खटला भरू, असे सांगताना जमीरउल्लाह यांनी स्थानिक हिंदुवादी नेता पूजा पांडे यांच्यावरही टिका केली. पांडे यांनी देखील ठाकरेंप्रमाणेच वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे. अलीगढ पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.