एमएसपीचे आश्वासन मिळण्यासाठी आणि वीज बिल मागे घेण्यासाठी अशा अनेक मागण्या पूर्ण करण्याकरिता शेतकरी अजूनही आंदोलनाला बसले आहेत. आता दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. सर्व शेतकरी २६ नोव्हेंबरला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीत पोहोचतील. काल लखनऊ येथे किसान महापंचायत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकेतसह अनेक शेतकरी नेते उपस्थितीत होते.
दरम्यान मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकरी आपल्या जागेवर ठाण मांडून बसलेले आहेत. २६ नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने २५ नोव्हेंबरला पंजाबहून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना होऊ शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी दिल्लीत दाखल होण्यासाठी पंजाबमध्ये गावागावात शेतकरी संघटना बैठक करत आहेत.
दिल्लीतील शेतकरी दौऱ्याबाबत शेतकरी नेते दर्शन सिंह म्हणाले की, ‘२५ नोव्हेंबरला आम्ही खनोरी बॉर्डवर एकत्र येऊ आणि २६ नोव्हेंबरला आमच्या संघर्षाला १ वर्ष पूर्ण होतील, त्यावेळी आम्ही दिल्लीत पोहोचू. दिल्लीत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये महिलांचा देखील समावेश असेल. यासाठी महिला निधी गोळा करत आहेत.’
महिला आंदोलक कौर म्हणाल्या की, ‘यावेळेस आम्ही ६ महिन्यांच राशन जमवून घेऊन जाऊ. सध्या महिला आपला वेगवेगळा निधी जमवत आहेत. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आश्वासनावर अजिबात विश्वास नाही जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत.’ दरम्यान माहितीनुसार, २७ नोव्हेंबरला अजून एक संयुक्त किसान मोर्चाची बैठक होणार आहे. तर २९ नोव्हेंबरला शेतकऱ्यांचा मोर्चा संसदेकडे वळणार आहे.
हेही वाचा – Mamata Banerjee Delhi Visit: ममता बॅनर्जी आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता