केंद्राने आणलेल्या ३ नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीतही हे शेतकरी गाझीपूर बॉर्डरवर ठाण मांडून बसले आहेत. कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे हे आंदोलन ८० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले तरी सुरुच आहे. शेतकरी आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर आंदोलनामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला आहे. केंद्र सरकारसोबत शेतकरी नेत्यांच्या अनेक बैठका झाल्या परंतु या बैठकांमध्ये काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलक अजूनही नाराज आहेत. वारंवार चर्चा आणि मागणी करुन केंद्र सरकार कृषी कायदे रद्द करत आहेत. म्हणून शेतकरी आंदोलक देशभरात रेल रोको आंदोलन करणार आहेत. रेल रोको आंदोलन १२ ते ४ या वेळात होणार आहे. रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्सच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज (गुरुवार १८ फेब्रुवारी) रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी रेल रोको आंदोलन १२ ते ४ या वेळात करणार आहेत. तसेच पंजाब,हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड या राज्यात रेल्वे गाड्या अडवण्यात येणार आहेत. असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. तर शेतकरी आंदोलकांनी मागील आठवड्यातच शेतकरी आंदोलनाचा इशारा दिला होता.
रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सनेही जय्यत तयारी केली आहे. रेल रोको आंदोलन शांततेत सुरु ठेवण्यासाठी स्पेशल फोर्सच्या २० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी रेल्वेने खबरदारी घेतली आहे.