राजधानी दिल्लीच्या सीमारेषांवर लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारकडून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं जात आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत माघार घ्यायची नाही असा ठाम निर्धार आता आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अर्थात २१ डिसेंबर रोजी आंदोलक शेतकरी २४ तासांसाठी उपोषण करणार आहेत. या उपोषणातून केंद्र सरकारला मागण्यांसंदर्भात इशारा देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. दरम्यान, फेसबुककडून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या Kisan Ekta Morcha या फेसबुक पेजवर कारवाई करून ते बंद केल्याचा निषेध शेतकऱ्यांनी ट्वीटरवरून केला होता. त्यानंतर रात्री उशिरा हे पेज पुन्हा सुरू झाल्याचं दिसत होतं.
ट्वीटरवर किसान एकता मोर्चाने (Kisan Ekta Morcha) आपला निषेध व्यक्त केला असून बंद करण्यात आलेल्या फेसबुक पेजचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते. या फेसबुक पेजवर कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केले असल्याची सबब देऊन फेसबुकने हे पेज बंद केलं होतं.
Action against Facebook Page is misuse of Govt. of India powers to suppress the dissent voices.
Dirty tactics when they can't beat ideologically.#DigitalKisan #KisanEktaMorcha pic.twitter.com/qsC6o5nW8O
— Kisan Ekta Morcha (@KisanEktaMarch) December 20, 2020
२१ डिसेंबरला शेतकऱ्यांचं उपोषण
दरम्यान, २१ डिसेंबरला म्हणजेच सोमवारी आंदोलक शेतकऱ्यांनी २४ तासांच्या उपोषणाची घोषणा केली आहे. तसेच, भारतीयांनीही एक दिवसाचा उपवास करून शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आलं आहे. रविवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत देखील कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.