आसाम-मिझोराम सीमा वाद अधिकच वाढताना दिसत आहे. सीमावादानंतर आता मिझोराम मध्ये आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मागील आठवड्यात कोलासिब येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनीच पोलीस अधिकाऱ्यांना समन्स देखील जारी केला आहे. मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांच्याविरोधात खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. मुख्यमंत्री सरमा यांच्यासह आसामचे ४ पोलीस अधिकारी आणि २ कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
आसाम आणि मिझोराम पोलिसांमध्ये सीमा वादावरुन हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात आसामच्या ७ पोलीसांचे निधन झाले होते. या हिंसाचारा प्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधात मिझोराममध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच २०० अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिझोरामच्या पोलिसांनी एफआयर दाखल करताना आरोप केले आहेत की, २०० पोलीस कर्मचाऱ्यांनी आयजीपी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली २० पोलिसांवर हल्ला केला. आरक्षित जमिनीवर पोलिसांनी जबरदस्ती अतिक्रमण करुन कँम्प लावला असल्याचे सांगत हल्ला केला आणि जमिन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. दाखल केलेल्या एफआयआरनुसार मिझोराम पोलिसांचे संख्याबळ कमी होते. यामुळे कँम्प ताब्यात घेणे शक्य नव्हते यामुळे घडलेल्या घटनेची माहिती मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांना देण्यात आली. पोलीस अधिक्षकांनी चर्चा करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र आसामचे पोलीस आपल्या भूमिकेवर ठाम होते.
आसाम मुख्यमंत्र्याच्या निर्देशानुसार हिंसाचार
मिझोराम पोलिसांनी म्हटलं आहे की, हिंसाचार आसाम मुख्यमंत्री सरमा यांच्या निर्देशानुसार करणात आला आहे. आसामचे पोलीस समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यांनी जबरदस्ती ही आसामची सीमा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आणि हा कॅम्प मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार बनवण्यात आला असल्याचेही आसाम पोलिसांनी म्हटलं असल्याचे मिझोरामच्या पोलीसांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
आसाम-मिझोराम सीमेवरुन २६ जुलै रोजी दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारामध्ये आसामच्या ७ पोलिसांचे निधन झाले आहे. संघर्ष झाल्यानंतर आता दोन्ही राज्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आसाममधील बराक परिसरातील सीमा मिझोराम राज्यातील आईजोल, कोलासीब या जिल्ह्यांना लागते. या जमिनीच्या कारणावरुन दोन्ही राज्यांत संघर्ष सुरु आहे. याच संघर्षातून हिंसाचार झाला होता परंतू आता हा हिंसाचार चिघळण्याची शक्यता आहे.