Flying kiss : मणिपूर हिंसाचारावरून (Manipur Violence) लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर बुधवारी (9 ऑगस्ट) सभागृहात चर्चा सुरू असताना महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधींवर (Rahul Gandhi) गंभीर आरोप केला की, भाषण संपवून संसदेबाहेर जाताना त्यांनी महिला खासदारांना लक्ष्य करत फ्लाइंग किस केले. यातून राहुल गांधींच्या कुटुंबाचे संस्कार दिसले, अशी टीकाही स्मृती इराणी यांनी केली होती. त्यांच्या आरोपानंतर देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. याप्रकरणी बोलताना राहुल गांधींच्या भाषणावेळी प्रेक्षक गॅलरीत असलेल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील (Rajni Patil) यांनी यावर सविस्तर भाष्य केलं आहे. (Flying kiss The story of Rahul Gandhis alleged kiss MP Rajni Patil told what exactly happened)
रजनी पाटील म्हणाल्या की, मणिपूर हिंसाचाराच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत राहुल गांधी यांचं भाषण सुरू होणार असल्यानं मी स्वत: प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. त्यांनी भाषण संपल्यावर जे काही केलं, त्याचा भाजपाकडून चुकीचा अर्थ काढला जात आहे. राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू असतानाही अनेक लोकांना फ्लाइंग किस दिले होते. हा शिष्टाचाराचा भाग आहे. परंतु तुम्ही एखाद्या गोष्टीकडं कसं बघता, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमच्या मनात वाईटच असेल तर, तुम्हाला वाईटच दिसणार, असं म्हणत रजनी पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला.
राहुल गांधीचं कथित फ्लाइंग किस
रजनी पाटील म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी भाषणाच्या वेळी आणलेले कागद खाली पडले. त्यामुळे भाजपाचे खासदार त्यांच्यावर हसत होते. परंतु राहुल गांधी यांनी त्यांना प्रत्युत्तर न देता वेगळ्या प्रकारे त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं. त्याच्या अशा वागण्यामागे सद्भाव होता. मी प्रेक्षक गॅलरीतून स्वत: सगळं जवळून पाहिलं आहे. भाजपाने गेली अनेक वर्षे राहुल गांधी यांची चेष्टा करून त्यांचं वेगळं रुप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण आता त्यांनी तसे करणे बंद केले पाहिजे, अशी मागणीही रजनी पाटील यांनी केली.
हेही वाचा – No-Confidence Motion : राहुल गांधी मणिपूरवर असे काय बोलले की ‘ते’ शब्द काढावे लागले? वाचा-
स्मृती ईराणी मणिपूरच्या महिलांबद्दल का बोलल्या नाहीत?
राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपला कुठलाही मुद्दा मिळत नसल्यानं असे घाणेरडे आरोप करण्यात येत आहेत, असे रजनी पाटील म्हणाल्या. हजारो महिला राहुल गांधींकडे येतात, विश्वासानं त्यांच्या खांद्यावर विसावतात, हे भाजपच्या लोकांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित करताना रजनी पाटील म्हणाल्या की, भाजपाच्या महिला खासदारांना आणि विशेषत: स्मृती ईराणींना महिलांचा इतका कळवळा आहे तर, मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार झाले, त्यावर त्या का नाही बोलल्यात? महिलांच्या विरोधातील इतर अत्याचारांवर त्या बोलत नाहीत आणि फ्लाइंग किसवर राहुल गांधींना नोटीस पाठवतात, असा हल्लाबोल रजनी पाटील यांनी स्मृती ईराणींवर केला.
हेही वाचा – Nirmala Sitharaman : “तुम्ही स्वप्नं दाखवत राहिलात, परंतु आम्ही…”; अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्लाबोल
काही लोकांनी आपली घाणेरडी वृत्ती सोडून द्यावी
राहुल गांधी यांनी दिल्लीतील निर्भयाच्या भावाला कुठलाही गाजावाजा न करता मदत केली होती. तो तरुण आज पायलट झाला आहे. राहुल गांधींमुळे मी पायलट झालो, हे त्या तरुणाने सांगितल्यानंतर संपूर्ण देशाला कळलं. त्यामुळं काही लोकांनी आपली घाणेरडी वृत्ती सोडून द्यावी, असेही रजनी पाटील म्हणाल्या.