माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार प्राप्त करणारे प्रणव मुखर्जी हे पाचवे राष्ट्रपती ठरले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी पुरस्कारांची घोषणा केली होती. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्री, नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
२६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह थोर समाजसेवक चंडिकादास अमृतराव देशमुख तथा नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर झाला होता. त्यानुसार आज राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूपेन हजारिका यांचे पुत्र तेज हजारिका यांनी ‘भारतरत्न’ पुरस्कार स्वीकारला. दीनदयाल संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांनी नानाजी देशमुख यांना जाहीर झालेला ‘भारतरत्न’ स्वीकारला. भारतरत्न पुरस्कार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे अभिनंदन केले.
Delhi: Former President Pranab Mukherjee receives 'Bharat Ratna' from President Ram Nath Kovind. pic.twitter.com/j9VmBbNEoP
— ANI (@ANI) August 8, 2019
‘भारतरत्न’ मिळविणारे ५ वे राष्ट्रपती
यापूर्वी, डॉ. एस. राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन आणि व्ही. व्ही. गिरी यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ८३ वर्षीय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. काँग्रेसप्रणित केंद्र सरकारमध्ये मुखर्जी यांनी अर्थ, संरक्षण, परराष्ट्र यांसारख्या मंत्रालयांचा पदभार यशस्वीपणे सांभाळला.