देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. बुधवारी रात्री थंडीने मागील ३० वर्षांचा विक्रम मोडित काढला आहे. रात्री उशिरा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये उणे ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच १९९१ नंतर शहरातील सर्वात थंड रात्र होती. १९९१ मध्ये उणे ११.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तर १९९५ मध्ये किमान तापमान उणे ११.३ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आले होते. हवामान खात्याच्या माहितीनुसार श्रीनगरमध्ये आतापर्यंतचे कमी तापमान १८९३ मध्ये उणे १४.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी रात्रीच्या थंडीमुळे श्रीनगरमधील डल तलाव गोठला आहे. या तलावात असणारी बोट जागीच गोठली आहे. तलाव गोठला असल्यामुळे नागरिक या तलावार चालत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे अनेकजणांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
काश्मीर खोऱ्यात थंडीचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिण्याही गोठल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे नागरिकांना पाण्याची समस्येलाही सामोरं जावे लागत आहे. श्रीनगरमधील रस्ते आणि दऱ्या खोऱ्यांत बर्फाची सफेद चादर पसरल्याचे दृष्य दिसत आहे. हे दृष्य विलोभनीय दिसत असले तरी स्थानिक नागरिकांसाठी हा कठीण प्रसंग आहे.
दिल्लीतही हुडहुडी भरवणारी थंडी
उत्तर भारतासह दिल्लीतही कडाक्याची थंडी आहे. दिल्लीतही अनेक जिल्ह्यात दाट धुक्यासह थंडी आहे. हिमालयाकडून येणाऱ्या थंड हवेमुळे दिल्लीतील थंडी वाढत आहे. दिल्लीत पुढील चार दिवस थंडी असेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. या थंडीतही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.
मुंबईतील उष्णतेने नागरिक हैराण
दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंड असली तरी मुंबईतील उकाडा मात्र वाढला आहे. मुंबईत या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी तापमानात थोडी घट झाली असली तरी उष्ण वातावरण आहे. ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना गर्मीचा सामना करावा लागत आहे.