घरताज्या घडामोडीट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? राऊत यांचा मोदींना सवाल!

ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? राऊत यांचा मोदींना सवाल!

Subscribe

पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर भारताला आव्हान देत आहेत.

भारत- चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आलं. तर चीनचे ४o हून अधिक सैनिक मारले गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र यानंतर भारतात मात्र चांगलच राजकारण तापलं. दररोज नव नवीन आरोप, प्रश्न सरकारला विचारले जाऊ लागले. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली असा हल्ला संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी आज सामनाच्या लेखातून गवलान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वाढलेल्या जवळकीवर टीका केली आहे. चीनने आपले २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे.

- Advertisement -

काय म्हटलय लेखात

२० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. १९६२चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळे हरलो हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही. गलवान व्हॅलीत चीनचे सैन्य घुसले व आज गलवान व्हॅली चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, ‘गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे.’ मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले व सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जिवंत आहेत व चीनच्या इशाऱयावर हिंदुस्थानला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्दैवाने आज तेच घडताना दिसत आहे”, असं राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे राऊत यांनी म्हटले आहे की, “आम्हाला आमच्या सीमारेषाच माहीत नाहीत व त्या सीमांच्या रक्षणासाठी देश बलिदान देत आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्य आले. आपल्या सैन्याने प्रतिकार केला. चीन म्हणते, हा सर्व भाग आमचाच. उलट तुम्हीच घुसखोरी केली. यावर आम्ही तसे चूप बसलो आहोत.

- Advertisement -

त्याचबरोबर लेखात राऊत यांनी अमेरिका आणि भारतात वाढत जाणाऱ्या मैत्रीवरही निशाणा साधला. “वीस सैनिक चीनबरोबरच्या झटापटीत हुतात्मा झाले. अनेक सैनिक बेपत्ता आहेत. ते याच झटापटीत खोल गलवान व्हॅलीत कोसळून मरण पावल्याची भीती आहे. आपला एकही सैनिक चीनचा बंदी नाही असे आधी सांगण्यात आले. प्रत्यक्षात आपले १० सैनिक चीनचे बंदी झाले. त्यांना नंतर चीनने सोडून दिले. हे चीनचे आक्रमण आहे व सरकार त्या आक्रमणाचा प्रतिकार करू शकले नाही. सरकारने या प्रकरणातल्या अनेक गोष्टी लपवून ठेवल्या, त्या आता उघड होत आहेत. पाकिस्तानचे सैन्य कारगिलपर्यंत पोहोचले हे समजताच पंतप्रधान वाजपेयींनी युद्धच पुकारले. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले? गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असे फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटले! चीनशी आपले भांडण न संपणारे आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हे ही वाचा – भारत-चीनी सैनिक पुन्हा भिडणार?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -