नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारने केलेल्या सिलिंडरच्या दर कपातीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत जेव्हा मतं कमी होऊ लागली, तेव्हा निवडणुकीच्या भेटवस्तू वाटल्या जाऊ लागल्या! जनतेचा कष्टाचा पैसा लुटणारे निर्दयी मोदी सरकार आता माता-भगिनींबद्दल सद्भावना दाखवत आहे. असे म्हणत मोदींवर चांगलेच शरसंधान साधले आहे.(Gifts are distributed only when votes begin to dwindle; Congress’s challenge to Modi)
खर्गे पुढे म्हणाले, साडेनऊ वर्षांपासून 400 रुपयांचे एलपीजी सिलिंडर 1100 रुपयांना विकून सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत होते, मग आपुलकीची भेट कुणाला का आठवली नाही? 140 कोटी भारतीयांवर साडेनऊ वर्षे अत्याचार करून त्यांना निवडणुकीचे लॉलीपॉप देऊन चालणार नाही, हे भाजप सरकारला कळू द्या. तुमची एक दशकाची पापे धुतली जाणार नाहीत असेही त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (29 ऑगस्ट) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा संबंध निवडणुकीशी जोडत काँग्रेसने केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
जनतेचा रोष 200 रुपयांनी कमी करता येणार नाही
खर्गे म्हणाले की, भाजपने लागू केलेल्या महागाईला तोंड देण्यासाठी काँग्रेस पक्ष अनेक राज्यांमध्ये गरिबांसाठी केवळ 500 रुपयांचे सिलिंडर वितरित करणार आहे. राजस्थानसारख्या अनेक राज्यांनी त्याची अंमलबजावणीही केली आहे. 2024 मध्ये देशातील त्रस्त जनतेचा रोष 200 रुपयांच्या अनुदानाने कमी करता येणार नाही, हे मोदी सरकारने जाणून घेतले पाहिजे.
हेही वाचा : Chandrayaan-3 मोठी अपडेट; दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनसह सापडले ‘हे’ धातू
इंडिया आघाडीची भिती वाटते
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे म्हटले की, विरोधकांच्या इंडिया आघाडीची भिती वाटतेय ते चांगले आहे. एकुणच जनतेने आपला निर्णय घेतला आहे. महागाईवर मात करायची असेल तर भाजपला बाहेरचे दरवाजे दाखवणे हाच पर्याय आहे असेही त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा : त्यांचे केस दिसत होते…; मुस्लिमबहुल देशात 14 मुलींसोबत लज्जास्पद कृत्य
पंतप्रधानानी केले ट्वीट
आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, रक्षाबंधन हा सण आमच्या कुटुंबात आनंद वाढवणारा दिवस आहे. गॅसच्या किमती कमी केल्याने माझ्या कुटुंबातील बहिणींच्या सोयी वाढतील आणि त्यांचे जीवन सुसह्य होईल. माझी प्रत्येक बहीण सुखी, निरोगी, आनंदी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.