दिल्ली आणि गुजरातच्या आर्चबिशपनंतर आता गोवा आणि दमण येथील आर्चबिशपांनाही भारतीय राज्यघटना धोक्यात असल्याचे जाणवू लागले आहे. गोव्याचे आर्चबिशप फिलिप नेरी फरारो यांनी कॅथलिक ख्रिस्ती लोकांना राजकारणातही ‘अॅक्टिव्ह’ राहण्याचा उपदेश एका पत्रातून दिला आहे. त्याचबरोबर फरारो यांनी सत्तेत असलेल्या भाजप सरकारला इशारा देत भारतीय घटना धोक्यात असल्याचे पत्रात म्हटले आहे.
आर्चबिशपच्या सचिवांनी दिले स्पष्टीकरण
फरारो यांच्या सचिवांनी पत्राचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणतात की, “आम्ही दरवर्षी अशा प्रकारचे पत्र प्रकाशित करत असतो. मात्र, यावर्षीच्या पत्रातील एक-दोन विधानांवरून जाणूनबुजून वाद घातला जातो आहे. हे पत्र आमच्या वेबसाइटवर प्रकाशित केले आहे. या विषयी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण पत्र वाचणे अपेक्षित आहे.”
पत्रात नक्की काय होतं?
आर्चबिशप फरारो यांनी रविवारी वर्धापनदिनानिमित्ताने प्रकाशित केलेल्या पत्रात लिहिले होते की, “हे सांगण फार महत्वाचे आहे की, आपल्या विश्वासू लोकांनी आज राजकारणात सहभागी होणे फार गरजेचे आहे. त्यांनी त्यांच्या विवेकशील गुणांनूसार प्रामाणिकपणे काम करत चापुलसीच्या राजकारणाला नष्ट करायला हवे. त्यांनी लोकशाहीला मजबूत करायला हवे. त्याचबरोबर राज्याच्या प्रशासनालाही शिस्त लावायला हवी. सामाजिक न्याय आणि आदर्शांना केंद्रस्थानी ठेवून भ्रष्ट प्रशासनाला नष्ट करायला हवे.”
विकासकामं आणि लोकांच्या पुनर्वसनावर काय म्हणाले आर्चबिशप
देशात सध्या विकासकामांसाठी अनेक लोकांचे पुनर्वसन होते आहे. याविषयी आर्चबिशप यांनी पत्रात म्हटले आहे की, “विकास कामांच्या नावाने लोकांकडून त्यांच्या जमिनी आणि घरे हिसकावून घेतली जात आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. लोकांनी कुठले कपडे घालावे, काय खावे, कसं राहावं यावर बंधने लादली जात आहेत.”