रांची : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलचे भाव गगनाला भिडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पेट्रोल आणि डिझेलनं शंभरी ओलांडलेली असून, दोन्ही इंधनाचे दर नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित करत आहेत. विशेष म्हणजे देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिलीय. हेमंत सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपये प्रति लिटर कपात जाहीर केलीय. हेमंत सोरेन सरकारने ही सवलत फक्त दुचाकींसाठी दिलीय. खरं तर बुधवारी झारखंड सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले होते. आता राज्यातील दुचाकी वाहनांना 25 रुपयांची सूट देण्यात आलीय, अशी माहिती त्या ट्विटमध्ये देण्यात आली होती.
26 जानेवारीपासून स्वस्त पेट्रोल मिळणार
खरे तर झारखंड सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी राज्य सरकारने रांचीमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सीएम हेमंत सोरेन यांनी पेट्रोलच्या किमतींबाबत महत्त्वाची माहिती दिली. गरीब व्यक्तीच्या घरात मोटरसायकल असूनही पेट्रोलच्या पैशांअभावी ती चालवता येत नाही. मला माझी पिके विकण्यासाठी बाजारात जाता येत नाही. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या मोटरसायकल किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरल्यास 25 रुपये प्रतिलिटर दराने त्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करू, असा निर्णय मी घेतलाय. 26 जानेवारीपासून आम्ही ही प्रणाली लागू करणार आहोत आणि एका गरीब कुटुंबाला ही रक्कम दरमहा 10 लिटरपर्यंतच्या पेट्रोलवर मिळू शकेल.
मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा
झारखंड सरकारने आपली दोन वर्षे पूर्ण होत असताना पेट्रोलच्या दरात एवढा मोठा दिलासा जाहीर करून एक प्रकारे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारचा हा निर्णय फक्त दुचाकींसाठी आहे, ज्याचा वापर मध्यमवर्गीय लोक करतात. अशा स्थितीत हेमंत सरकारचा नवीन वर्षावरचा हा मास्टर स्ट्रोकही अनेक संकेत देत आहे. मात्र, २५ रुपयांच्या सवलतीचा लाभ केवळ शिधापत्रिकाधारकांनाच घेता येणार आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये सध्या एक लिटर पेट्रोल 98 रुपये 52 पैसे दराने विकले जात आहे. त्याच वेळी डिझेलचा दर 91 रुपये 56 पैसे प्रति लिटर आहे. आता अशा परिस्थितीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांची कपात झाल्याने झारखंडमधील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.