गुजरात किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात सात भारतीय मच्छिमारांचे अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी 20 ते 25 पाकिस्तानी नौदलाच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. नौदलाच्या जवानांनी मच्छिमारांवर गोळीबार सुरु केल्याचा आरोप आहे. या घटनेत बोटीचे नुकसान झाले असून बोट बुडण्यापासून थोडक्यात बचावली आहे. ज्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबर रोजी सात मच्छिमार एका बोडीतून जखाऊ किनारपट्टीवर भारतीय हद्दीत मासेमारी करत होते. त्यावेळी पाकिस्तान सागरी सुरक्षा संस्थेच्या बोटीवरील 20 ते 25 सैनिकांनी भारतीय बोटीवर विनाकारण बेछूट गोळीबार केला. तसेच बोट नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानी जवानांनी मच्छिमारांचे अपहरण करत त्यांना त्यांच्या बोटीत नेले, यावेळी भारतीय मच्छीमारांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सर्व भारतीय मच्छिमार गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानी सैनिकांनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला ज्यात मच्छिमारांना धमकावून सोडून दिले. यावेळी पोरबंदरचे पोलीस अधीक्षक रवी मोहन सैनी यांनी सांगितले की, शुक्रवारी भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीद्वारे मच्छिमारांची सुटका करून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरात आणण्यात आले. यानंतर जखाऊ येथे एफआयआर नोंदविण्यात आला आणि पोरबंदर जिल्ह्यातील नबीबंदर या पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. ज्यांचे प्रादेशिक कार्यक्षेत्र गुजरात किनारपट्टीपासून १२ नॉटिकल मैलांपेक्षा जास्त आहे.
एफआयआरनुसार, भारतीय दंडाच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 365 (अपहरण), 427 (दुखापत करणे), 324 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 506 (1) अंतर्गत पाकिस्तानी नौदलाच्या कर्मचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रवीमोहन सैनी यांनी सांगितले की, मच्छिमारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे.